नागपूर शहर
Wikipedia कडून
नागपूर | |
जिल्हा | नागपूर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | २४,२०,००० २००६-अंदाजे |
दूरध्वनी संकेतांक | ०७१२ |
टपाल संकेतांक | ४४०-xxx |
वाहन संकेतांक | MH-३१, MH-४० |
निर्वाचित प्रमुख | महापौर () |
प्रशासकीय प्रमुख | लोकेश चंद्रा (आयुक्त) |
नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी व राज्यात तिसरे सर्वात मोठे शहर आहे. नागपूर नागरी क्षेत्र (urban conglomeration) हे भारतातील तेरावे मोठे आहे. नागपूर शहर हे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर, नागपूर जिल्हा व नागपूर डिविजनचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास 'संत्रेनगरी' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
अनुक्रमणिका |
[संपादन] भूगोल व हवामान
नागपूरचे क्षेत्रफळ २२० कि.मी² आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मि.मी. इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. उन्हाळा ऋतु मार्च ते जून असतो व मे महिन्यात पारा सर्वात वर असतो. या काळात नागपूरचे तापमान ४०° सें. इतके असते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे तापमान १०° से.च्या खाली जाते.
[संपादन] इतिहास
नागपूरचा सर्वात प्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवाळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स.९४० रोजीचा आहे.छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांच समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले. १७४२ मधे रघुजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. १८१७ मधे सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला१८६१ मध्ये नागपूर सेंट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी करण्यात आली.
१८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेलमार्ग विकसित केला गेला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्वपूर्ण योगदान दिले. कॉंग्रेसची २ अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर मध्य प्रांत व बेरार भारतातील एक प्रांत बनला. मध्य प्रदेश राज्य १९५० रोजी बनले व या राज्याची राजधानीचा मान नागपूरला मिळाला. १९५६च्या राज्य पुनर्रचना आयोगाने नागपूर-बेरार भाग बॉम्बे राज्यात घातला. कालांतराने इ.स.१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व नागपूर-बेरार भाग नव्या राज्यात सामील करण्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याची चर्चा होती कारण दिल्ली ही पाकिस्तान व चीनच्या सीमेजवळ आहे.१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आज नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरवले जाते.
[संपादन] नागपुरातील नामांकित संस्था
नागपूरचे राजकीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. त्यामुळेच सुमारे दोन आठवडे चालणारे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. येथे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालयदेखील येथेच आहे.
नागपुरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च इंस्टिट्यूट (NEERI), सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लॅंड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च अँन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इंस्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह्वज ऑफ द पेट्रोलियम अँन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.
भारतीय सैन्याच्या दृष्टीनेसुध्दा नागपूर महत्त्वाचे शहर आहे. भारतीय वायुदलाच्या निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपुरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपुरातील केंपटी (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था(कॅंटोन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कॉर्प्स ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इंस्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या आय.एल-७६ या वाहतूक विमानांचा तळ(गजराज आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिविल लाइन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या (zero milestone) दगडापासून केले जातात.
[संपादन] पर्यटनस्थळे
दीक्षाभूमी-- सुप्रसिद्ध स्थळ . इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. अशोक दशमी/ आंबेडकर स्मृतिदिनी देशाभरातील दलित व बौद्धजन येथे भेट देतात.
सीताबर्डी किल्ल्यात १८१७ रोजी ब्रिटिश व भोसले साम्राज्यात मोठे युद्ध झाले होते. त्यात ब्रिटिश जिंकले व शहर त्यांच्या ताब्यात गेले. शहरातील प्रत्येक भागात मोठे हिंदू प्रार्थनास्थळ असून रामनगर येथील श्री पोद्दारेश्वर राम मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. कोराडी येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमी गर्दी असते. नवरात्री सणादरम्यान येथे विशेष गर्दी असते. कॅथॉलिक सेमिनरी, बौद्ध ड्रॅगन प्लेसदेखील प्रसिद्ध आहेत.
शहरातील अंबाझारी, तेलंगखेडी, गांधीसागर, गोरेवाडा व सोनेगाव ही तलावे पर्यटकात प्रिय आहेत. पैकी अंबाझारी परिसरात रम्य उद्यान आहे व नागपुरात जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. भोसले शासकांनी विकसित केलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्लभ प्राणी-पक्षी आहेत. पेंच संरक्षित वने (यांचा रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल-बुक या पुस्तकात उल्लेख आहे) नागपुरापासून ४५ कि.मी उत्तरेस आहेत.
विदर्भ क्रिकेट संघटनेचे मैदान हे देशातील कसोटी क्रिकेट खेळले जाणार्या ९ मैदानांपैकी आहे. वर्धा रस्त्यावर निर्माण होत असलेल्या नव्या मैदानात ८०,००० प्रेक्षकांची व्यवस्था असणार आहे. नागपुरात अनेक उपहारगृहे (हॉटेल) आहेत. तिथे भारतीय व आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जेवण मिळते. लिबर्टी व स्मृती ही लोकप्रिय चित्रपटगृहे आहेत, शहरातील पहिले मल्टिप्लेक्स वर्धमाननगरात आहे तर आणखी तीन तयार होत आहेत. चित्रपटगृहात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. नागपुरात्त हॉटेल टुली इंटरनॅशनल व हॉटेल प्राईड ही पंचतारांकित हॉटेल आहेत. सेंट्रल अँव्हेन्यू परिसरात अनेक लहान-मोठी उपहारगृहे आहेत.
[संपादन] लोकजीवन व संस्कृती
मराठी ही नागपुरातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथे देखिल बोलली जाते. हिंदी व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.
नुकतेच नागपूरला सर्वात स्वच्छ व (बंगळूर नंतरचे) दुसरे सर्वात हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूर जागेच्या किंमती मर्यादेत आहेत पण रामदासपेठ व सिवील लाईन्स परिसरातल्या जागेचे भाव खूप जास्त आहेत. नागपूर महानगरपालिका पुरेसं पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही परंतु राज्यातील वीजटंचाई मुळे भारनियमन होते.शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. पोद्दारेश्वर राम मंदीर रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजीत करते. उर्वरीत भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सण देखिल साजरे केले जातात.
नागपुरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजले जातात. महाराष्ट्र शासन आयोजित कालीदास महोत्सव आठवडाभर चालतो व येथे संगीत-नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार येथे भाग घेतात. संत्रनगरी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र आयोजित करते. नागपुरकर भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. पं.भीमसेन जोशी व अनेक सुप्रसिध्द कलाकार येथे अनेकदा आपले कार्यक्रम आयोजित करतात. मराठी नाटकांना नागपूर मध्ये मोठा लोकाश्रय मिळतो.
नागपूर आकाशवाणी, नागपूर दुरदर्शन ही माध्यमे स्थानिक बातम्या, घडामोडी व कार्यक्रम प्रसारीत करतात. लोकमत, सकाळ, तरुण भारत व लोकसत्ता ही मराठी दैनिके प्रसिध्द आहेत. अनेक इंग्रजी व हिंदी भाषीक वृत्तपत्रे येथे उपलब्ध होतात.