चंगीझ खान
From Wikipedia
अनुक्रमणिका |
[संपादन] बालपण
चंगीझ खानाचा जन्म ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. त्याच्या जन्मापूर्वी येसुगेईने, तेमुजीन उगे या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव तेमुजीन असे ठेवले. तेमुजीन लहान असतानाच त्याचे वडील त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्याला आपल्या समवेत घेऊन दुसर्या टोळीच्या भेटीस गेले. तेथे तेमुजीनचे लग्न त्या टोळी प्रमुखाची मुलगी बोर्ते हिच्याशी ठरवण्यात आले. मंगोल टोळ्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे तेमुजीनला लग्नापूर्वी आपल्या नववधूच्या घरी काही वर्षे राहून तिच्या कुटुंबियांची सेवा करणे भाग होते. त्यानुसार त्याला बोर्तेच्या घरी ठेवून येसुगेई एकटाच परतला.
परंतु वाटेत एका सहभोजनाच्या दरम्यान येसुगेईला तातार टोळीने विषप्रयोग करून मारले. तेमुजीनपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर तो बोर्तेला मागे ठेवून आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करूनच आपल्या टोळीत परतला. येसुगेईच्या मागे दोन बायका व सात मुले अशा सर्वांची जबाबदारी लहानग्या तेमुजीनवर येऊन पडली. तेमुजीनच्या कमी वयामुळे त्याच्या टोळीतील इतरांनी त्याला टोळीप्रमुख बनवण्यास आक्षेप घेतला आणि त्याला, तसेच त्याच्या कुटुंबाला हाकलून दिले. त्यामुळे तेमुजीनच्या मनात स्वत:च्या टोळीबद्दलच घृणा निर्माण झाली.
[संपादन] खडतर काळ व युद्धमय जीवन
मंगोलियाच्या उजाड पठारावरील या कठीण कालखंडात तेमुजीनने आपल्या कुटुंबाची सर्वपरीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याची मैत्री दुसर्या एका टोळीतील त्याच्याच वयाच्या जमुगाशी झाली. दोघांनी बंधुत्त्वाच्या शपथा घेतल्या. यानंतर एकदा तेमुजीन मासे पकडत असता त्याच्या हाती आलेला मासा त्याच्या बेख्तेर या सावत्र भावाने चोरला व एकटयानेच फस्त केला. अशा कठीण काळात मिळालेले अन्न वाटून न खाण्याची वृत्ती पाहून तेमुजीनने बेख्तेरला अन्न चोरी केल्याची शिक्षा म्हणून ठार केले. बेख्तेर हा तेमुजीनपेक्षा वयाने अंमळ मोठा असल्याने त्याने आपल्याच घरातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करून स्वत:च्या मार्गातील काटा दूर केला असे ही म्हटले जाते.
या गोष्टीचा गवगवा होऊन पुढे एकदा शिकारीवर असताना तेमुजीनला त्याच्याच टोळीकडून जेरबंद केले गेले. तिथे तेमुजीनने रक्षकांना ठार करून मोठ्या कौशल्याने आपली सुटका केली व परत येऊन तो आपल्या कुटुंबाला मिळाला. तेमुजीनच्या शौर्याची कीर्ती सर्वदूर पसरली. पुढे त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊन त्यांना लुटले गेले, त्यात त्याचे घोडे लुटारूंनी पळवले. तेमुजीनने लुटारूंचा पाठलाग केला, पण तो व्यर्थ ठरला. याच सुमारास त्याची गाठभेट बोगुर्ची या धनाढ्य इसमाशी झाली. या दोघांत घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि बोगुर्चीने तेमुजीनला त्याचे चोरलेले घोडे परत मिळवून देण्यास फार मदत केली.
त्यानंतर सुमारे चार वर्षांनी तेमुजीनचे लग्न बोर्तेशी झाले, पण दुर्दैवाने थोड्याच काळात बोर्तेचे दुसर्या एका टोळीकडून अपहरण करण्यात आले. तेमुजीन व त्याचे कुटुंबीय या टोळीचा सामना करण्यास असमर्थ होते. तेमुजीनने बोर्तेला परत मिळवण्यासाठी वांग खान नावाच्या आपल्या वडिलांच्या मित्राची मदत घेण्याचे ठरवले व दोघांनी मिळून तातार व इतर मंगोल टोळ्यांवर हल्ले करण्यास साथ देण्याची शपथ घेतली. त्यानुसार वांग खान आपल्या योद्ध्यांसमवेत तेमुजीनला येऊन मिळाला. यावेळेस तेमुजीनचे वय १७ वर्षे होते. वांग खानचे नाव काही ठिकाणी तोग्रुल असल्याचे वाचनात आले आहे. वांग खानने बोर्तेच्या सुटकेसाठी तेमुजीनला दुसर्या एका मित्र टोळीतील योद्ध्याची मदत घेण्यास सांगितले. हा योद्धा दुसरा तिसरा कुणी नसून चंगीझचा बालमित्र जमुगा होता. दोघांनी आपल्या मित्रत्वाच्या आणा भाका पुन्हा ताज्या केल्या व बोर्तेचा शोध घेऊन तिची सुटका केली.
त्यानंतर जमुगा व तेमुजीन यांनी एकत्र आपली टोळी प्रस्थापित केली, या टोळीची कीर्ती लवकरच मंगोल पठारावर सर्वदूर पोहोचली; पण थोड्याच काळत जमुगाला, तेमुजीन वरचढ होतो आहे अशी भीती वाटू लागली व त्याने तेमुजीनला टोळीतून बाहेर पडून वेगळी टोळी स्थापन करण्याचे सुचवले. यामुळे दुखावलेला गेलेला तेमुजीन आपल्या कुटुंबासमवेत जमुगाच्या टोळीतून रातोरात बाहेर पडला.
या नंतरच्या काळात बरेच योद्धे व लहान मोठ्या टोळ्या आपली शस्त्रे, माणसे, घोडे घेऊन तेमुजीनला येऊन मिळाल्या. तेमुजीनने आपल्या हजारोंच्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. जमुगाच्या टोळीशी मात्र त्याने वैर पत्करले व पुढील अनेक वर्षे मंगोल टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जमुगा व तेमुजीनच्या टोळीत अनेक चकमकी झाल्या.
[संपादन] तेमुजीन ते चंगीझ खान नावाचा प्रवास
११८३ साली तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला 'चंगीझ' असे संबोधण्यास सुरुवात केली. चंगीझ या शब्दाचा अर्थ 'सर्वोत्तम योद्धा' असा समजला जातो. जरी चंगीझला 'सर्वोत्तम योद्धा' असे संबोधले गेले तरी या काळात बऱ्याच मंगोल टोळ्या चंगीझच्या आधिपत्याखाली आलेल्या नव्हत्या. यापुढील काळात अनेक स्वार्या करून त्याने आपले स्वामित्व सिद्ध केले.
तरीही तो आणि जमुगा; वांग खानचे मांडलिक म्हणूनच ओळखले जात. जमुगा हा चंगीझचा बालपणीचा मित्र आणि एका सबळ टोळीचा प्रमुख होता. जातीने त्याची व वांग खानची जमात चंगीझच्या जमातीपेक्षा श्रेष्ठ गणली जाई. याकारणास्तव पुढे या दोघांना चंगीझ डोईजड होऊ लागला. १२०० च्या सुमारास वांग खान व जमुगाच्या टोळीच्या चंगीझच्या टोळीशी चकमकी झडू लागल्या. १२०१ मध्ये जमुगाच्या आणि वांग खानच्या टोळीला चंगीझने जवळजवळ संपुष्टात आणले. जमुगाशी शेवटची लढाई १२०३ मध्ये लढली गेली व यात चंगीझने जमुगाला बंदिवान केले. त्याला चंगीझने आपल्या आधिपत्याखाली यायचे आमंत्रण दिले. जमुगाने तसे करण्यास नकार दिला व चंगीझकडे देहदंडाची शिक्षा मागितली. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे जमुगाने 'रक्ताचा एकही थेंब न सांडता मरण द्यावे' अशी इच्छा प्रकट केली. त्यावर चंगीझने आपल्या जुन्या प्रिय मित्राला दोन गोधड्यांखाली दाबून गुदमरवून मृत्यू दिला. अशा प्रकारे सर्व मंगोल टोळ्यांवर चंगीझने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
यानंतर १२०६ पासून चंगीझने आपल्या नावामागे 'खान' लावायला सुरुवात केली. खान या मंगोल शब्दाचा अर्थ 'शासक' असा होतो. मंगोलियातील सर्व टोळ्या आपल्या आधिपत्याखाली आल्यावर चंगीझने चीनवर स्वारी करण्याचा बेत आखला.
[संपादन] चीनवर स्वारी
त्या काळात चीन तीन मोठ्या साम्राज्यांत विभागले गेले होते. १२०७ मध्ये चंगीझने चीनमध्ये प्रवेश करून भूभाग जिंकण्यास सुरुवात केली. १२१५ पर्यंत बीजिंग जिंकून त्याने उत्तर चीन गिळंकृत केला आणि आपला मोर्चा पश्चिमेकडे वळवला. १२१८ मध्ये त्याने मध्य आशियावर स्वार्या केल्या. तेथे झालेल्या तुंबळ युद्धात चंगीझ खानासोबत सुमारे एक लाखाहून अधिक सैन्य लढले. तर शाह, मुहम्मद दुसरा या मध्य आशियातील सत्ताधार्याकडून सुमारे चार लाखाहून अधिक सैन्य लढले. तरीही अंतिम विजय चंगीझ खानाच्या सैन्याचाच झाला. संपूर्ण चीन जिंकायचे चंगीझचे स्वप्न मात्र त्याच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. ते पुढे त्याचा नातू कुबलाई खान याने पूर्ण केले.
यानंतर चंगीझने आपले सुमारे २०,००० सैन्य रशियाला रवाना केले. १२२३ मध्ये चंगीझच्या सैन्याने रशियाच्या ८०,००० वर सैन्याचा पाडाव केला व त्यांना पळता भुई थोडी केली. तिथून त्यांनी प्रचंड लुटालूट, जाळपोळ करत युरोपात प्रवेश केला. मार्गात येणार्या सर्व शहरांना लुटून बेचिराख करत चंगीझच्या सैन्याने रशिया, पोलंड व हंगेरीची सर्व महत्त्वाची शहरे लुटली.
आपल्या कारकीर्दीत त्याने आजच्या काळातील मंगोलिया, चीन, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्कस्तान, इराक, इराण, कझाकस्तान, कुर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कुवेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, माल्दोवा या सर्व देशांच्या भूभागांवर निर्विवाद स्वामित्व मिळवले.
[संपादन] कुशल शासनकर्ता
एका बाजूने लुटालूट, जाळपोळ आणि शत्रूपक्षाच्या सार्वत्रिक हत्यांमुळे क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा चंगीझ दुसर्या बाजूने अतिशय कुशल, उदार व निष्ठावान शासनकर्ता म्हणूनही ओळखला जात असे. आपल्या सैन्यातील माणसांकडून तो संपूर्ण निष्ठेची अपेक्षा ठेवायचा. त्याच्या राज्यात राज्यद्रोह्यांना देहदंड दिला जाई. इतकेच नव्हे तर शत्रूपक्षाच्या फुटिर व राज्यद्रोही माणसांनाही त्याने देहदंडाची शिक्षाच दिल्याचे दिसून येते. तो अत्यंत कुशल सेनापती होता, चंगीझने आपल्या सैन्यात शिस्त बाणवली. त्याच्या सैन्यातील अधिकारी पद हे त्या त्या योद्ध्याच्या शौर्यावर व क्षमतेवर अवलंबून असे. सेनाधिकार्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार श्रद्धा होती. मंगोल टोळ्यांचे फुटणे, एकमेकांपासून दुरावणे हे नित्याचे असले तरीही चंगीझच्या इतक्या वर्षांच्या राजवटीत त्याचा एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही यावरून त्याचे माणसे जोडून ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. युद्धात एखादा सैनिक मेला तर केलेल्या लुटीतला वाटा त्याची विधवा व पोरक्या मुलांकडे पोचता केला जाई. चंगीझच्या या कायद्यामुळे त्याचे दोन फायदे झाले; त्याचे सैनिक मृत्युपश्चात आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्याच्यासाठी मरायला तयार होत व मेलेल्या सैनिकांचे कुटुंब चंगीझशी प्रामाणिक राहत असे.
चंगीझचे सैन्य केवळ मंगोल वंशाचे नव्हते; तर त्याने ज्या ज्या भूभागावर स्वारी केली तेथील राज्यांतील व टोळ्यांतील लोकांचाही आपल्या सैन्यात समावेश केला. आपल्या सैन्यात एकजूट रहावी म्हणून त्याने एक नवा कायदा अस्तित्वात आणला. त्यानुसार त्याने १० सैनिकांचा एक गट, अशा १०० गटांचा दुसरा गट अशी सैन्याची विभागणी केली. या गटांतील प्रत्येकाने बंधुत्वाची शपथ घेऊन एकमेकांशी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक ठेवावी असा कायदा केला.
कुशल नेतृत्वाव्यतिरिक्त चंगीझच्या यशाची दोन प्रमुख कारणे आढळतात. सबळ हेरखाते हे त्यातील पहिले कारण होते. तर दुसरे कारण होते - एखाद्या भूभागावर स्वारी केल्यानंतर जर त्याला त्या शहरातून किंवा राज्याकडून विरोध झाला, तर तो ते शहर संपूर्ण बेचिराख करून टाकत असे; पण त्याचबरोबर युद्धसंधी करणार्या, त्याच्या विरुद्ध शस्त्रे न उचलणार्या शरणागतांना तो अभयदान देत असे. या दुसर्या कारणामुळे त्याच्याविषयी दहशत व आदर एकत्र दिसून येई.
त्याकाळातील बर्याच मंगोल टोळ्या या रानटी व अशिक्षित होत्या. आपल्या साम्राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्याने कडक कायदे अस्तित्वात आणले. बायकांना पळवणे हा अक्षम्य गुन्हा मानला जाई. बायकांच्या खरेदी विक्रीला चंगीझने बंदी आणली. जन्मास आलेल्या सर्व संतती औरस असतील असा त्याने कायदा केला. इतरांची जनावरे पळवणे, हरवलेले जनावर किंवा हरवलेली संपत्ती हडप करणे हे ही गंभीर गुन्हे मानले जात.
[संपादन] मृत्यू
१२२७ मध्ये शिकार करत असता घोड्यावरून पडून चंगीझ खान जबर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उलानबातरजवळील त्याच्या जन्मगावी नेण्यात आला. असं म्हटलं जातं की त्याच्या मृत्यूची बातमी फुटून अंदाधुंदी माजू नये म्हणून अंत्यविधीत सामील होणार्या सर्वांना तेथेच ठार करण्यात आले. त्यामुळे चंगीझची मूळ कबर कुठे आहे त्याबाबत अजूनही वाद आहेत.
(अपूर्ण)