कर्ण
Wikipedia कडून
कर्ण हा महाभारतातील कुंतीचा प्रथम पुत्र (तसेच सूर्यपुत्र) व दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. तो राधेय ह्या नावानेसुद्धा ओळखला जात होता. तसेच तो आपल्या दानशूरपणाबद्दल सुद्धा प्रसिद्ध होता.
अनुक्रमणिका |
[संपादन] जन्म
कुंतीभोज राजाची कन्या कुंती हिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषिंनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला, आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती.
[संपादन] बालपण
कुमारी माता बनलेल्या कुंतीने घाबरून एका टोपलीत घालून त्या मुलाला गंगा नदीत सोडून दिले. अधिरथ नावाच्या हस्तिनापुरला सारथी म्हणून काम करणार्या सूताला ती टोपली मिळाली. त्याने आणि त्याची पत्नी राधा यांनी त्या मुलाचे पालन केले. त्यांनी त्या मुलाचे नाव "वसुसेन" ठेवले, परंतु त्याच्या कुंडलांमुळे तो "कर्ण" नावाने प्रसिद्ध झाला. राधेचा पुत्र म्हणून तो "राधेय" नावानेही ओळखला जात असे.
अधिरथ आणि राधा यांना शोण नावाचा मुलगा होता.
[संपादन] शिक्षण
अधिरथ कर्ण आणि शोण ह्यांना घेऊन हस्तिनापुरास आला आणि कृपाचार्यांकडे त्याचे शिक्षण सुरू झाले.
[संपादन] राज्याभिषेक
जेव्हा कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांच्यातील सर्वोत्कॄष्ट योद्धा ठरविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये अर्जुनाने सर्व युद्धप्रकारांमध्ये आपले प्राविण्य दाखविले. हे बघून चिडलेल्या कर्णाने आपले अर्जुनापेक्षा वरचढ कौशल्य सर्वांना दाखविले, आणि स्पर्धेचा खरा जेता ठरविण्यासाठी अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले.
त्या काळातील नियमांनुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कूळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होवू शकत असे. या नियमाचा आधार घेऊन कृपाचार्यांनी कर्णाला आपले कूळ जाहीर करावयास सांगितले. हे ऐकून दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेल्या अर्जुनाच्या तुल्यबळ करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला. दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीची ही सुरुवात मानली जाते.
[संपादन] द्रौपदी स्वयंवर
द्रुपद राजाची कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरासाठी त्याने धनुर्विद्येचा कठीण पण लावला होता. हा पण जिंकण्यासाठी दुर्योधन कर्णास घेऊन पांचाल राज्यात गेला. (पांडवांच्या वारणावतातील मॄत्यूनंतर तो पण पूर्ण करू शकणारा कर्ण हा एकमेव योद्धा मानला जात होता) स्वयंवराच्या वेळी जेव्हा कर्ण पण पूर्ण करण्यासाठी पुढे आला तेव्हा द्रौपदीने "मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही" असे म्हणून त्याचा अपमान केला.
नंतर ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या अर्जुनाने तो पण जिंकला. ह्या घटनेनंतर पांडवांबद्दलचे (विशेषतः अर्जुनाबद्दलचे) कर्णाचे वैर आणखीनच वाढले.
[संपादन] राजसूय यज्ञ
पांडवांनी इंद्रप्रस्थात केलेल्या राजसूय यज्ञासाठी हस्तिनापुराहून गेलेल्या राजांमध्ये कर्णाचा समावेश होता. मयसभेत झालेल्या दुर्योधनाच्या अपमानाचा कर्ण साक्षीदार होता.
[संपादन] द्यूत आणि द्रौपदी वस्त्रहरण
पांडवांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल मत्सरग्रस्त होऊन दुर्योधनाने आपला मामा शकुनी ह्याच्या सल्ल्याप्रमाणे युधिष्ठिराला विष्णूजित यज्ञाच्या निमित्ताने द्यूत खेळण्याचे आमंत्रण दिले. ह्या द्यूतात सर्व राज्य गमावलेल्या युधिष्ठिराने आपले बंधू, आपण स्वतः आणि अखेरीस आपली पत्नी द्रौपदी ह्यांना पणावर लावले.
हरलेल्या द्रौपदीला निर्वस्त्र करण्याची दुर्योधनाने आज्ञा दिली, तेव्हा स्वयंवरात द्रौपदीने केलेला आपला अपमान स्मरून कर्णाने त्याला प्रोत्साहन दिले.सर्व बाबतीत अतिशय धार्मिक असलेल्या कर्णाला त्याची ही चूक अखेरपर्यंत डाचत राहिली.
[संपादन] चित्रसेनाशी युद्ध
वनवासात असलेल्या पांडवांना आपल्या वैभवाचे दर्शन करवण्यासाठी दुर्योधनाने आपल्या दासदासींसह पांडवांच्या पर्णकुटीजवळ असलेल्या तलावात जलक्रीडेसाठी जायचे ठरवले. परंतु तिथे आधीच आलेल्या चित्रसेन नावाच्या गंधर्वाने कर्णाचा मायावी युद्धात पराभव करून दुर्योधनास कैद केले. अर्जुनाने युधिष्ठिराच्या आज्ञेवरून युद्धात चित्रसेनाचा पराभव करून दुर्योधनास मुक्त केले.
[संपादन] दिग्विजय
राजसूय यज्ञासाठी चार पांडवांनी एकेक दिशेला जाऊन दिग्विजय केला. त्यामुळे चिडून, आणि चित्रसेनाकडून झालेल्या अपमानकारक पराभवानंतर आपले शौर्य दाखविण्यासाठी कर्णाने हस्तिनापुराच्या सैन्याचा सेनापती बनून सर्व आर्यावर्तातील (चारी दिशांची) राज्ये जिंकली.
कृष्णाबद्दल असलेल्या आदराचे प्रतिक म्हणून कर्णाने त्याच्या मथुरा आणि द्वारका राज्यांवर ह्या दिग्विजयात चाल केली नाही.
[संपादन] कवच-कुंडलांचे दान
दिग्विजयानंतर दानधर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली, की त्याच्या दारातून एकही याचक परत जाणार नाही. आपला मुलगा अर्जुन ह्याच्या रक्षणासाठी इंद्राने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच-कुंडलांचे दान मागितले. कवच-कुंडलांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत, हे माहीत असुनही कर्णाने आपली कवच-कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली. त्याच्या ह्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखे केले, आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक शक्ती (एक प्रकारचे अस्त्र) कर्णाला दिली.
[संपादन] ब्रम्हास्त्रप्राप्ती आणि शाप
कवच-कुंडलांचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रम्हास्त्रप्राप्ती करण्याचे ठरवले. द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरू असलेल्या परशुरामांकडून ब्रम्हास्त्र मिळवले.
परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला, आणि ब्रम्हास्त्राची प्राप्ती करून घेतली. परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना, एका किड्याने त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोपमोड होवू नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या, परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही, हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कूळ विचारले. सत्य कळताच त्यांनी कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रम्हास्त्राचे स्मरण होणार नाही. ह्याच काळात एका गरीब ब्राह्मणाच्या, चिखलात अडकलेल्या गायीची (शिकारीच्या वेळी) हत्त्या चुकून कर्णाच्या हातून घडली. त्याने कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याच्या रथाचे चाक असेच जमिनीत अडकेल.
[संपादन] कॄष्णशिष्टाई
वनवास आणि अज्ञातवास भोगून पांडवांनी आपले राज्य परत मागण्यासाठी दूत म्हणून कृष्णाला हस्तिनापुरास पाठविले. दुर्योधनाने जेव्हा त्याची मागणी नाकारली, तेव्हा परत जाताना कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले, आणि पांडवांकडे चलण्याची विनंती केली. जरी कुंतीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्ण पांडवांच्या संपूर्ण राज्य आणि संपत्तीचा स्वामी झाला असता, तरीपण त्याने दुर्योधनाच्या मैत्रीस स्मरून युद्धकालात कौरवांची बाजू सोडून जाण्यास नकार दिला.
[संपादन] महायुद्ध
महायुद्धाच्या पहिल्या दिवशी कौरवांतर्फे भीष्मांना सेनापतीपद देण्यात आले. त्यांनी विविध सेनाप्रमुख नेमताना कर्णाचा "सुतपुत्र, कवच-कुंडले नसल्याने आणि शापित" म्हणून अर्धरथी ,म्हणून अपमान केला. हा अपमान सहन न होवून कर्णाने भीष्म जिवंत असेपर्यंत रणभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा केली.
युद्धाच्या १० व्या दिवशी भीष्म शरशायी पडले असता, भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून त्यांनी कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले, आणि पांडवांच्या (व धर्माच्या) बाजूने लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्रकर्तव्याला जागण्याचे ठरविले.
त्याच दिवशी कुंतीने स्वतः येऊन कर्णाची भेट घेतली, आणि त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या विनंतीला मान देवून कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले.
दुसर्या दिवशीपासून झालेल्या युद्धात कर्णाने प्रचंड पराक्रम गाजवला. सेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात तो इतर योद्ध्यांबरोबर सर्वात आतील कड्यात होता. चक्रव्यूह तोडून आत आलेल्या अभिमन्युवर कर्ण, द्रोणाचार्य, जयद्रथ, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि लक्ष्मण ह्या ६ योद्ध्यांनी एकदम हल्ला केला. त्यानंतर लक्ष्मणाशी झालेल्या युद्धात अभिमन्युचा मॄत्यू झाला.
युद्धाच्या १४ व्या दिवशी शस्त्र खाली ठेवलेल्या द्रोणाचार्यांचा धृष्टद्युम्नाकडून शिरच्छेद झाल्याने चिडलेल्या कौरवांकडून रात्रयुद्धाला प्रारंभ झाला. त्या युद्धात भीमाचा पुत्र घटोत्कच याने कौरवांकडून लढणार्या २ राक्षसराजांचा वध केला. तेव्हा घटोत्कचाकडून कौरवसेनेचा पराभव होवू नये म्हणून कर्णाने इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून त्याचा वध केला.
त्यानंतर दुर्योधनाने कर्णाला कौरवसेनेचा सेनापती म्हणून अभिषेक केला. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला, परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले.
[संपादन] मॄत्यू
युद्धाच्या १७ व्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले. परंतु, अखेरीस कर्णास ब्राह्मणाने दिलेल्या शापामुळे त्याच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले, आणि त्याचा रथ जागेवर अडकून पडला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निशःस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला, परंतु द्रौपदी-वस्त्रहरण आणि अभिमन्युच्या मॄत्यूप्रसंगी कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली, आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले. स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली, परंतु परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्रांचे स्मरण झाले नाही, आणि अर्जुनाचा अंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला.
युद्धानंतर कृष्णाने युधिष्ठिराला कर्णाच्या आणि पांडवांच्या नात्याबद्दल सांगितले, आणि युधिष्ठिराने इतर नातेवाईकांबरोबर कर्णाचे श्राद्धसंस्कार केले.
[संपादन] इतर माहिती
[संपादन] दानवीर कर्ण
पहिल्यापासून कर्ण दानधर्म करीत असे. परंतु इंद्राला दिलेल्या कवच-कुंडलांच्या दानामुळे "दानवीर कर्ण" म्हणून त्याची किर्ती सर्वत्र पसरली.
[संपादन] युद्धनैपुण्य
द्रोणाचार्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये कर्णाने आपल्या युद्धनैपुण्याचे प्रदर्शन करून स्पर्धेचा खरा विजेता ठरविण्यासाठी अर्जुनास द्वंद्वाचे आव्हान दिले. तसेच, द्रौपदीच्या स्वयंवराचा पण पूर्ण करू शकणारे अर्जुन आणि कर्ण हे केवळ दोघे धनुर्धारी आर्यावर्तात आहेत असे मानले जाई.पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञासाठी एकेका दिशेचा दिग्विजय केला, त्यानंतर कर्णाने एकट्याने कौरवसेना घेवून सर्व आर्यावर्तात दिग्विजय केला. भीष्मांनी जरी त्याचा अपमान केला असला, तरी त्यांनी कर्णाकडून त्याच्या बंधूंचा वध होवू नये म्हणून, आणि त्यांच्या पांडवांवरील प्रेमामुळे त्यास युद्धामधून बाहेर ठेवण्यासाठी ते कॄत्य केले. महाभारतातील सर्वोत्कॄष्ठ योद्धा म्हणून अर्जुनाचा लौकिक असला, तरीपण ह्या सर्व गोष्टींवरून, आणि अर्जुनाशी झालेल्या त्याच्या युद्धावरून ते दोघे तुल्यबळ योद्धे होते हे सिद्ध होते. जरी युद्धात अर्जुनाने कर्णाचा वध केला असला, तरीपण ह्या वेळी कर्ण हा शापित आणि कवच-कुंडलविरहीत होता. त्यामुळे, कर्ण हा मुळात अर्जुनाहून प्रबळ योद्धा असण्याची शक्यता आहे.
[संपादन] संदर्भ
महाभारतावरील सर्व संदर्भ "महाभारत" लेखामध्ये सादर केले आहेत.